मूख्यमंञ्याच्या जिल्हातच रेती माफियांचा धुमाकूळ ? महसूल विभागातील काही अधिकारी आणी रेती माफियांच्या संगनमताचा शिवसेनेचा गंभीर आरोप "शासनाचे आदेश धाब्यावर, कोट्यवधींच्या महसूल लुटीकडे कोणाचे दुर्लक्ष?" – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी; कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यात शासनाने ९ जून २०२६ पासून सर्व अधिकृत रेती घाट बंद करण्याचे आदेश लागू केले असतानाही जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि ओव्हरलोड रेती वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या संपूर्ण अवैध कारभारामागे महसूल विभागातील काही अधिकारी, प्रशासनातील काही घटक आणि रेती माफियांचे संगनमत असल्याचा थेट आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गडचिरोलीचे पालकमंत्री यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर कठोर फौजदारी कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवन राधो गेडाम यांनी दिला आहे. प्रेस नोटमध्ये नमूद केल्यानुसार, शासनाने रेती घाट बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल विभागाकडून अवैध उत्खननाविरोधात काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर अचानक कारवाई थंडावली आणि अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या ओव्हरलोड ट्रॅक्टर, डंपर आणि हायवा वाहनांद्वारे रेतीची वाहतूक सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की केवळ कागदोपत्री आदेश दिले गेले आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेने आरोप केला आहे की, जिल्ह्यातील अनेक रेती घाटांवर बंदी असतानाही अवैध उत्खनन सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा अवैध व्यवसाय प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्यच नसल्याने महसूल विभागातील काही अधिकारी आणि रेती माफियांच्या संगनमताची सखोल चौकशी करावी. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची उघडपणे लूट होत असताना संबंधित यंत्रणा मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, अवैध रेती उत्खननामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे.